पंतप्रधान आवास योजेनेचे काम प्रकल्पग्रस्तांना देण्याच्या मागणीसाठी धाकटा खांदा ग्रामस्थ आक्रमक
प्रभात पर्व न्यूज - Published: 23-Nov-2020 04:46 pmपनवेल : धाकटा खांदा गावाजवळ सुरु असलेल्या शासनाच्या पंतप्रधान आवास योजेनेचे सुरु असलेले काम प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे या मागणीसाठी धाकटा खांदा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पावर मोर्चा नेऊन त्याठिकाणी ठिय्या मांडला. यावेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, प्रभाग 'क' च्या सभापती नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
धाकटा खांदा गावानजीक पंतप्रधान आवास योजनेच्या इमारती उभारणीचे काम सुरु होत आहे. या इमारती सिडकोच्या जागेवर उभारण्यात येणार आहेत. सिडकोने धाकटा खांदा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल भावाने घेऊन त्यांना त्याचा हवा तास मोबदला देखील अद्याप दिलेला नाही. ग्रामस्थांच्या जमिनीवर हे आवास योजनेचे काम सुरु होणार असल्याने कामाचे मुख्य ठेकेदार शापूरजी पलनजी यांच्याकडील हे काम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती . त्यावेळी ठेकेदाराचे प्रतिनिधी ग्रामस्थांना चालढकलपणा करून वेळ मारून नेत होते. या ठेकेदाराने त्यांना हवे तसे दरपत्रक ग्रामस्थांकडून घेतले. पण तरीही त्याला ठेकेदाराने मान्यता न देता लॉकडाऊन लागताच मुंबई येथे परस्पर निविदा काढल्याचे सांगत मुंबई येथील एस . बी. ट्रान्सपोर्ट कंपनीला काम दिल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी मोर्चा नेला तेव्हाही ठेकेदाराच्या प्रतिनिधीने वेळ काढू पणा करून ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडले. त्यानंतर एस. बी. कंपनीच्या प्रतिनिधीने गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आमिषे देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला नागरिक भुलले नाहीत. याच दरम्यान एस. बी. कंपनीने गावात भांडणे लावण्याच्या उद्देशाने परस्पर गावातील एकाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले पण ग्रामस्थांनी याविषयी त्या व्यक्तीशी चर्चा झाल्यावर मात्र एस. बी . कंपनीला ग्रामस्थांनी एकत्र येऊन धडा शिकवण्याचे ठरले. त्यानुसार मूळ ठेकेदार शापूरजी पलनजी यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. पण पोलिसांचा दबाव वापरून ग्रामस्थांचा विरोध मोडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.
नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी ही बाब आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कानावर घातली आणि त्यानुसार पुन्हा सर्व ग्रामस्थ प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी मोर्चा नेला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले . त्यावेळी देखील पोलीस पहारा ठेवण्यात आल्याने ठेकेदार पोलिसांना हाताशी धरून चुकीचे काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ठेकेदार चाल ढकल पण करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी ठिय्याच मांडला. अखेर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मध्यस्थी करून कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर, ग्रामस्थ आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्या बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांना सध्या तरी अर्धे काम देण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले असून उरलेले एस. बी. कंपनीचे काम देखील ग्रामस्थच करतील असे देखील सांगण्यात आले. पण यावर ठोस निर्णय दोन दिवसात होणार असून तो निर्णय जा सकारात्मक न होता ठेकेदाराच्या बाजूने झाला तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी बोलताना दिला.