मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 'नैना' संदर्भातील भूमीपुत्रांचे प्रश्न सोडवणार- खासदार श्रीरंग बारणे
प्रभात पर्व न्यूज - Published: 22-Nov-2020 06:30 pmपनवेल : पनवेल परिसरातील २३ गावांतील ग्रामस्थांचा नैना प्रकल्पाला विरोध असून शिवसेना भूमीपुत्रांच्या या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे. येथील गरजेपोटी बांधलेली घरे, स्थानिकांना होणारा सिडकोकडून त्रास, विरार-अलिबाग कॉरिडोर मार्ग याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसू नये त्यादृष्टीनेसुद्धा शिवसेना त्यांच्याबरोबर असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पनवेलमधील विहीघर येथे आयोजित करण्यात आलेल्या भूमीपूत्रांच्या या बैठकीत खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे,ॲड.सुरेश ठाकूर, नामदेव फडके, उपतालुकाप्रमुख बबन फडके, नवीन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे, अनिल ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती सातत्याने या प्रश्नावरून लढा देत आहे. २३ गावांचा या प्रकल्पाला विरोध आहे. २०१३ साली या प्रकल्पाला सुरवात झाली. परंतु अद्याप फक्त जमिनी अडवून ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक भूमीपूत्रांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. येथील भूमीपूत्र मोठ्या अडचणीत आहेत. यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती बारणे यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, शिवसेनेच्या माध्यमातून सिडकोकडे स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यात आली आहे. शिवसेना ८०% समाजकारण व २०% राजकारण करते. नैनाच्या प्रश्नावरूनसुद्धा शिवसेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभी आहे व त्यांनी न्याय मिळवून देऊ असेही शिरीष घरत यांनी सांगितले.